अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून झालेल्या गारपीट , वादळ आणि पाऊस मुळे अनेक पिकांचे नुकसान झाल्याने राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी कुऱ्हे आणि टाकरखेडा येथे नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले.
बुधवारी सायंकाळी चार वाजता कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील कुऱ्हे येथील सुनीता गोरख कुंभार यांच्या शेतातील मक्याच्या नुकसानीची आणि टाकरखेडा येथील कैलास शांताराम पाटील यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यांनतर ते लोणे भोने येथे पाहणी करून धरणगाव ,एरंडोल कडे रवाना झाले. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रथमेश पाटील , तहसीलदार मिलिंदकुमार वाघ , जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर , तालुका कृषी अधिकारी भारत वारे ,पोलीस निरीक्षक विजय शिंदे , पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे मंडळाधिकारी पी एस पाटील , तलाठी महेश अहिरराव हजर होते.
सरसकट पंचनामे करण्याची मागणी
तालुक्यात टाकरखेडे येथे नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी बरेच शेतकरी पंचनाम्यापासुन वंचित आहेत, तसेच गारपिट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावुन गेलेला आहे. हे नुकसान कुठेही एका विशिष्ट भागात नाही तर सर्वत्र आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे व्हावेत व तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मंत्री सत्तार यांच्याकडे केली.
सरसकट पंचनामे करण्याचे आदेश
मागणीची दखल घेत, शासन अतितातडीची मदत जाहीर करण्यासाठी सकारात्मक असुन एकही शेतकरी पंचनाम्याशिवाय राहु नये, सर्वांचे सरसकट पंचनामे व्हावेत जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहु नये असे आदेश उपस्थित तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांना मंत्री सत्तार यांनी दिले. यावेळी तसेच अमळनेर शिवसेना व टाकरखेडे येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने कृषी मंत्री यांचे सत्कार करून स्वागत केले.